नांदेड नायगाव मध्ये १ हजार १२७ किलो गांजा जप्त, मुंबई एनसीबीची मोठी कारवाई
प्रतिनिधी।एम बी कवठेकर
नांदेड प्रतिनिधी। मुंबई एनसीबीने आज नांदेड जिल्ह्यात केलेल्या मोठ्या कारवाईत १ हजार १२७ किलो गांजा जप्त केला आहे. या जप्त केलेल्या गांजाची किंमत ५ कोटी ६३ लाख रुपये सांगण्यात येते..
ट्रकद्वारे आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथून हा गांजा महाराष्ट्रात आणण्यात आला होता. या प्रकरणी एनसीबीने दोघांना ताब्यात घेतले आहे.
आंध्र प्रदेशातून महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर गांजा आणण्यात येणार असल्याची गुप्त माहिती एनसीबीला मिळाली होती. त्यानुसार त्या गुप्त माहितीच्या आधारे अमोल मोरे आणि सुधाकर शिंदे या दोन अधिकाऱ्यांच्या नेतृत्वातील पथकाने सापळा रचून आज पहाटे नांदेड जिल्ह्याच्या नायगाव तालुक्यातील मांजरम येथे नांदेड हैदराबाद मार्गावर १२ चाकी ट्रक ताब्यात घेतला आहे.
या ट्रकमधून १ हजार १२७ किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी एनसीबीने दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे. या प्रकरणाचा सखोल तपास करण्यात येत आहे.
या बारा चाकी ट्रकमधील गांजा नांदेडमधून जळगावला जाणार होता. तेथे यातील काही गांजा देऊन ही ट्रक पुढे महाराष्ट्रभर गांजाचे वितरण करणार होती, अशी माहिती एनसीबीचे मुंबई विभागीय संचालक समीर वानखेडे यांनी माहिती दिली आहे..
या प्रकरणी एनसीबीने ९८/२०२१ या क्रमांकाने गुन्ह्याची नोंद केली आहे. ट्रकमधून आणलेला गांजा कोणाला पोहोचवला जाणार होता, याचा तपास सुरू आहे. या प्रकरणातील इतर तस्करांना लवकरच अटक केली जाण्याची शक्यता आहे. या ट्रकमध्ये गांजाने भरलेली ४९ पोती होती. या पोत्यांचे प्रत्येकी वजन २४ ते ३० किलो आहे.
एनसीबीचे पथक तीन दिवसांपासून या ट्रकच्या मार्गावर होते. एनसीबीने आंध्र प्रदेशातून हा ट्रक महाराष्ट्रात दाखल होऊ दिला. आज सोमवारी पहाटे चार वाजता मांजरम येथे हा ट्रक आडवण्यात आला आणि या ट्रकमधून १ हजार १२७ किलो गांजा जप्त करण्यात आला आहे..!